शालेय विद्यार्थ्यांची डोळे तपासणी: २० लाख विद्यार्थ्यांना मोफत चष्मे | महाराष्ट्र शासन
राज्यातील २० लाख शालेय विद्यार्थ्यांची डोळे तपासणी; गरजू विद्यार्थ्यांना मोफत चष्मे

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील शासकीय शाळांमधील इयत्ता पाचवी ते दहावीच्या तब्बल २० लाख विद्यार्थ्यांची डोळे तपासणी करण्यासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तपासणीत दृष्टीदोष आढळलेल्या पात्र व गरजू विद्यार्थ्यांना नंबरचे चष्मे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या उपक्रमासाठी शालेय शिक्षण विभाग, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि वनसाईट एस्सिलार लक्सोटिका फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत सोमवारी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
या वेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त राजीव मेहता आणि वनसाईट एस्सिलार लक्सोटिका फाउंडेशनचे संचालक वेणू अंबाती यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
२० लाख विद्यार्थ्यांची होणार डोळे तपासणी
सामंजस्य करारानुसार राज्यातील शासकीय शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष डोळे तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत राज्यभरात विविध ठिकाणी डोळे तपासणी शिबिरे आयोजित केली जातील.
या संपूर्ण प्रकल्पाची अंमलबजावणी शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून केली जाणार आहे. रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट प्रकल्पाचा अंमलबजावणी भागीदार, तर वनसाईट एस्सिलार लक्सोटिका फाउंडेशन तांत्रिक भागीदार म्हणून काम करणार आहे.
दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत चष्मे
तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांना दृष्टीदोष असल्याचे आढळल्यास पात्र विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार नंबरचे चष्मे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे डोळ्यांची तपासणी किंवा चष्मा घेणे शक्य न होणाऱ्या विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा मोठा फायदा होणार आहे.
३६ महिन्यांचा विशेष प्रकल्प
या सामंजस्य करारानुसार प्रकल्पाचा कालावधी ३६ महिने असणार आहे. या कालावधीत राज्यभरात टप्प्याटप्प्याने डोळे तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाईल.
प्रकल्पाच्या प्रगतीवर नियमितपणे देखरेख ठेवण्यात येणार असून त्रैमासिक प्रगती अहवाल तयार केला जाणार आहे. यामध्ये आयोजित केलेल्या तपासणी शिबिरांची संख्या, तपासणी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या, लाभार्थी विद्यार्थ्यांना वितरित केलेले चष्मे आणि प्रकल्पाच्या इतर महत्त्वाच्या बाबींचा आढावा घेतला जाईल.
विद्यार्थ्यांच्या माहितीच्या गोपनीयतेवर भर
विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याशी संबंधित आवश्यक माहितीचे वैज्ञानिक पद्धतीने संकलन केले जाणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहावी यासाठी गोपनीयता आणि डेटा संरक्षणाच्या तरतुदींना सामंजस्य करारात विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या दृष्टीसाठी महत्त्वाचा उपक्रम
शालेय वयात दृष्टीदोष वेळेत लक्षात आल्यास त्यावर योग्य उपाययोजना करणे शक्य होते. राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांची तपासणी आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत चष्मे उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेण्यास मदत होणार आहे.












