बी.ई./बी.टेक आणि एमबीए/एमएमएस प्रवेश प्रक्रियेसाठी तीन दिवसांची मुदतवाढ; प्रमाणपत्र सादरीकरणासही सवलत
मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी बी.ई./बी.टेक आणि एमबीए/एमएमएस यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ जुलै २०२५ होती. मात्र विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ही मुदत आता ११ जुलै २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. ही माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
प्रवेश प्रक्रियेत विविध आरक्षण प्रवर्गांतून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंतिम प्रवेश प्रक्रियेच्या तारखेपर्यंत ईडब्ल्युएस (EWS), एनसीएल (NCL), सीव्हीसी (CVC), टीव्हीसी (TVC) प्रमाणपत्रे सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. ही सवलत मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून अनेक विद्यार्थी आणि पालक जातप्रमाणपत्र तसेच जातपडताळणी प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी करत होते. या पार्श्वभूमीवर काही तांत्रिक अडचणींचा विचार करून, विशेषतः एससी व एसटी वगळून इतर प्रवर्गांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास अडचण येत असल्यास, याबाबत धोरणात्मक निर्णय मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे अनेक उमेदवारांना दिलासा मिळणार असून त्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे. प्रवेश प्रक्रियेतील अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर नियमित भेट देण्याचे आवाहनही मंत्री पाटील यांनी यावेळी केले आहे.